नागपूर दिनांक.4 ऑक्टोंबर 2025 : - देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर नागपूरमध्ये एव्हिएशन हब होण्याची क्षमता आहे. त्यामुळे हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही तडजोड न करता जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. आपल्या सर्व क्षमतांचा वापर करून या क्षेत्राला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज - शनिवार दि.४ ऑक्टोबर २०२५) केले. विकसित भारतामध्ये उड्डयन क्षेत्राची भूमिका या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. एअर ट्रॅफिक कंट्रोलर गिल्ड ऑफ इंडियाच्या वतीने ४ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये केंद्रीय उड्डयन मंत्रालय एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्याचप्रमाणे विविध खाजगी कंपन्याचे विमान वाहतूक क्षेत्रातील भागधारक सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमाला भारतीय विमान प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक योगीराज सोरटे एअर ट्रॅफिक कंट्रोलर गिल्ड ऑफ इंडियाचे महासचिव आलोक यादव असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे सचिव डॉ. विजय कुमार शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. ना. श्री. गडकरी पुढे म्हणाले गेल्या दहा वर्षांमध्ये देशातील विमानतळांची संख्या ७५ वरून १५० झाली आहे. देहरादून ते दिल्ली या स्पाईस जेट्स विमान प्रवासात बायो एव्हिएशन फ्युएलचा वापर करण्यात आला आहे. देशाचे शेतकरी आता परळी राइस हस्क यापासून बायो एव्हिएशन इंधन तयार करू शकतात.
एम्फिबीयस सीप्लेन अर्थात जमिनीवर आणि पाण्यावर चालणारे विमान याची आवश्यकता आहे. जल आणि वायूमार्गाद्वारे प्रवासी वाहतूक खर्च किफायतशीर आणि जलद करणे काळाची
गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याकरिता दिशानिर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वे उड्डयन क्षेत्राच्या तज्ञांद्वारे तयार होणे आवश्यक आहे. हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये अद्यावत तंत्रज्ञानाचे अंतर्भाव त्याचप्रमाणे प्रवासी वाहतुकीचा महसूल वाढवण्यासाठी नवनव्या योजनांचा या क्षेत्रातील हितधारकांनी सखोल विचार करावा असे त्यांनी यावेळी नमुद केले.